नवी दिल्ली – भारतात डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. मात्र ही अर्थव्यवस्था सुरक्षित पद्धतीने वाढण्यासाठी सायबर सुरक्षेकडे निरंतर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत बाजार नियंत्रक सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी व्यक्त केले.
सायबर सुरक्षा विषयक एका प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना त्यागी म्हणाले की, सायबर सुरक्षा ही एक वेळ करून संपवण्याची गोष्ट नाही. ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अशी यंत्रणा विकसित करून त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेअर बाजाराचे कामकाज व्यवस्थित चालावे याकरिता सेबी सायबर सुरक्षेकडे निरंतर लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.