गावसकर यांनी भारतीय संघाबाबत केले मतप्रदर्शन
मुंबई – भारतीय संघ समतोल असला तरीही मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर संघाची धुरा समर्थपणे हाताळू शकेल अशा फलंदाजाची नितांत गरज आहे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघातील क्रमवारी पाहिली तर त्यांच्याकडे 4, 5 व 6 या क्रमांकावर फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. काही संघांकडे या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र, भारतीय संघाचा समतोल पाहिला तर अशा फलंदाजाची सध्या विराट कोहलीच्या संघाला गरज आहे. सलामीवीर किंवा वनडाऊन क्रमांकावरील फलंदाज प्रत्येक सामन्यात धावा करू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीचे फलंदाज बाद झाले तर संघाचा डाव सावरण्यासाठी तसेच प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व राखण्यासाठी चौथ्या क्रमांकावर असा भक्कम फलंदाज असणे अत्यंत आवश्यक आहे, असेही गावसकर म्हणाले.
गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा चांगला फलंदाज नव्हता. जर असा खेळाडू असता तर त्या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची भारताला निश्चितच संधी मिळाली असती, असेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाची संधी होती. संघ तुल्यबळही होता. मात्र, प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर संघाचा डाव सावरू शकेल असा चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज नव्हता. या एका चुकीमुळे संघाने करंडक गमावला, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व कर्णधार विराट कोहली यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.