शशिकांत भालेकर
प्रशासनाने फिरविली पाठ; महावितरणच्या गलथान कारभारामुळे दोघांचा बळी
पारनेर – महावितरणच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील जवळा येथील आदिवासी ठाकर समाजातील मामा व भाचीचा मृत्यू झाला. तुटलेल्या वीजेच्या तारेला चिकटून या दोघांचा जागीच मृत्यू झाला होतो. या घटनेला चार ते पाच दिवस लोटले तरी अद्याप प्रशासनाने या कुटुंबाची दखल घेतली नाही. अधिकारी फिरकलेच नाही तर त्यांना मदत तरी कशी मिळणार अशी स्थिती झाली आहे.
जवळा येथे पत्रकाराला शिवीगाळ व धमकी व या घटनेचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी पत्रकार संघाचे दीपक मेढे, दत्ता उनवणे, शशिकांत भालेकर, देवदत्त साळवे, अनिल चौधरी, भास्कर कवाद, शिरीष शेलार, संदीप सालके, विलास जाधव, अंकुश देशमुख, भाऊसाहेब आढाव, विलास बरसिले, प्रदीप सोमवंशी, आबा सालके आदी या कुटुंबाची भेट घेवून माहिती घेतली. त्यावेळी महावितरण काय पण महसूलचे अधिकारी आले नसल्याची माहिती मिळाली.
जवळा येथे ठाकर समाजाची जवळपास दीडशे दोनशे लोक या वस्तीवर राहत आहे. येथील लोक रानातील असणाऱ्या शिकारीच्या माध्यमातून आपलं अन्न शोधत असतात. असंच कामावरून सुटल्यानंतर खेकडे पकडत असताना ओढ्यामध्ये तुटलेल्या तारीचा अंदाज न आल्याने त्या तारे विद्युतप्रवाह सुरू असल्यामुळे सुभाष जाधव व सोनाली कैलास देशमुख या मामा भाचीचा विजेच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर प्रशासनाने या ठाकर वस्तीकडे पाठ फिरवली. ग्रामसेवक, तलाठी किंवा इतर अधिकारी याठिकाणी गेलाच नाही. अनेक वर्षापासून हे लोक पालावर राहत आहेत, मात्र त्यांना पक्का निवारा अद्याप मिळालेला नाही. घरकुलाचे प्रकरण येऊन जागेअभावी पुन्हा मागे गेली. ज्या ठिकाणी राहत आहे. तेथे वन विभागाची जमीन आहे. घरकुलासाठी जागा मिळावी अशी मागणी या लोकांची अनेक दिवसांपासून आहे मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नाही.
मृत्युमुखी पडलेल्या सुभाष जाधव यांच्या पश्चात लहान मुले व पत्नी आहे. त्यांना भविष्यात शासकीय पातळीवर आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, मात्र शासनस्तरावरून अद्याप हालचाली झाल्या नाहीत. ज्या विद्युत प्रवाहामुळे दोघांचा बळी गेला. त्या प्रवाहाची घडलेल्या घटनेपूर्वी तार तुटून चार दिवस झाले होते. तसे ग्रामस्थांनी विद्युत महामंडळाला फोनद्वारे माहिती कळवली होती, मात्र प्रवाह बंद न केल्यामुळे या दोघांचा बळी गेला.
या गलथान कारभारामुळे महामंडळावर व संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली. तहसीलदार, गटविकास अधिकारी, महामंडळाचे अधिकारी किंवा इतर कोणतेही अधिकारी एवढी मोठी गंभीर घटना घडली असताना देखील त्या ठिकाणी गेले नाही पाहणी केली नाही. मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला भेट दिली नाही. त्यांना आर्थिक मदतीसाठी शासन पातळीवरून मदतीसाठी प्रयत्न केले नाही वस्तीवरील ठाकर समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.