मुंबई – शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत. शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली होती. शिवसेना बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यास भाग पाडण्यात आले होते. शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने आणि निष्ठावान होते. आम्ही अद्यापही जुने संबंध विसरु शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ होतो. बाकी टीडीपीचे काही नक्की नसते. नितीश कुमारही येऊन जाऊन असतात, असे त्यांनी म्हंटले आहे.
एनडीएत कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा झाली असती तर बरे झाले असते. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल असे सर्वांचे म्हणणे आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले. या विधेयकावर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह शरद पवार यांच्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.