जेजुरी – उत्तर-पूर्व पुरंदर आणि उत्तर-पश्चिम बारामती तालुक्यासाठी संजीवनी समजल्या जाणाऱ्या नाझरे (मल्हार सागर) धरणात 680 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून 73 टक्के धरण भरले असल्याने जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगावसह सुमारे 49 गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.
जेजुरी शहराच्या उत्तर दिशेला 788 दशलक्ष घनफूट पाणी क्षमता असलेला नाझरे जलाशय असून मागील आठवड्यात पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसाने जलाशयात विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी जलाशयातील पाणलोट क्षेत्रात पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे. शनिवारी (दि. 10) सायंकाळपर्यंतचा 680 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झालेला असल्याची माहिती शाखा अभियंता एस. बी. चवलंग व वरिष्ठ लिपिक विश्वास पवार यांनी दिली. गेल्या जूनमध्ये जलाशय पूर्णतः कोरडा पडला होता. सोमवती यात्रेवेळी खंडेरायाच्या उत्सवमूर्तींना टॅंकरच्या पाण्याने कऱ्हास्नान घालण्यात आले होते. मात्र, आता येणाऱ्या सोमवती उत्सव स्नानाची पर्वणी भाविकांना कऱ्हेच्या पाण्यात लुटता येणार आहे.