जेजुरी- उत्तर-पूर्व पुरंदर आणि उत्तर-पश्चिम बारामती तालुक्यासाठी संजीवनी समजल्या जाणाऱ्या नाझरे (मल्हार सागर) जलाशयात 680 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून 73 टक्के जलाशय भरला असल्याने जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगावसह सुमारे 49 गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. जून व जुलै महिन्यात कोरडा ठाक पडलेल्या आणि गेल्या तीन वर्षांत प्रथमच इतका पाणीसाठा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जेजुरी शहराच्या उत्तर दिशेला 788 दशलक्ष घनफूट पाणी क्षमता असलेला नाझरे जलाशय असून मागील आठवड्यात पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसाने जलाशयात विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी जलाशयातील पाणलोट क्षेत्रात पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे. शनिवारी (दि. 10) सायंकाळपर्यंतचा 680 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झालेला असल्याची माहिती शाखा अभियंता एस. बी. चवलंग व वरिष्ठ लिपिक विश्वास पवार यांनी दिली.
गेल्या जूनमध्ये जलाशय पूर्णतः कोरडा पडला होता. सोमवती यात्रेवेळी खंडेरायाच्या उत्सवमूर्तींना टॅंकरच्या पाण्याने कऱ्हास्नान घालण्यात आले होते. मात्र, आता पुढील काळात येणाऱ्या सोमवती उत्सव स्नानाची पर्वणी भाविकांना कऱ्हेच्या पाण्यात लुटता येणार आहे.
- ऐतिहासिक पेशवे तलाव कोरडाच
मध्य पुरंदरमधील म्हणजेच शिवरी, साकुर्डे, जेजुरी शहरातील ऐतिहासिक पेशवे तलाव, होळकर तलाव, कोळविहिरे, दौडज, राख, नावळी, गुळुंचे, पांडेश्वर आदी ठिकाणचे बंधारे, ओढे यंदाच्या पावसाळ्यात वाहिलेच नाहीत. अजूनही पाणी टंचाईची समस्या काही गावांना भेडसावत आहे. या पट्ट्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.