कुमारमंगलम बिर्ला; नवी कौशल्य शिकावी लागतील
मुंबई – करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. जागतिक व्यापार, राजकारण, ग्राहकांची खरेदी करण्याची सवय इत्यादींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना आगामी काळात अस्तित्वात राहण्यासाठी कामाच्या स्वरूपात बदल करावे लागणार आहेत, असे ज्येष्ठ उद्योजक कुमारमंगलम बिर्ला यांनी म्हटले आहे.
हिंदाल्कोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना ते म्हणाले की, ज्या जिल्ह्यातून राष्ट्रीय उत्पन्नाच्या 80 टक्के उत्पादन होते, ते जिल्हे रेड किंवा ऑरेंज झोन म्हणून जाहीर झाले होते. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होणार असल्यामुळे विकासदर शून्य टक्क्यांच्या खाली जाणार आहे.
यातून बाहेर पडण्यासाठी विविध देशांतील सरकार कर्ज काढून खर्च करीत आहेत. यामुळे या देशांची तूट वाढून महागाई वाढण्याची शक्यता आहे.
ग्राहक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देणार आहे. याचा कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होणार आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत टिकाव धरून ठेवण्यासाठी कंपन्यांना कामकाजात बदल करावे लागतील. कर्मचाऱ्यांना नवी कौशल्य शिकावी लागतील. लॉकडाऊन संपुष्टात आले आहे. त्यामुळे विविध उद्योग पूर्वपदावर आले आहेत. मात्र, तरीही पर्यटन, आदरातिथ्य या क्षेत्रातील उद्योगांना पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी लागणार आहे.
मंदी मोठी पण कमी कालावधीची
बिर्ला यांनी सांगितले की, अचानक निर्माण झालेल्या या पेचप्रसंगात अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. मात्र, जमेची बाजू म्हणजे ही मंदी मोठी असली तरी दीर्घकाळ टिकणारी नाही. लस आल्यानंतर सर्व नागरिक पूर्ण ताकदीने पुन्हा कामाला लागण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रांतील लॉकडाऊन उठविण्याचा प्रयत्न चालू आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून कंपन्यांना आगामी काळात आपली वाटचाल करावी लागणार असल्याचे कुमारमंगलम बिर्ला म्हणाले.