नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून एनडीएमधून अकालीदल हा पक्ष बाहेर पडल्यानंतर आता एनडीएमधील आणखी एका पक्षाने या आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा भाजपला दिला आहे.
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी असे या पक्षाचे नाव आहे. त्या पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून मोदी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार तीनही कृषी विषयक कायदे त्वरित रद्द करावेत अन्यथा आम्हालाही एनडीएप्रणित आघाडीतून बाहेर पडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मोदी सरकारने शेतकऱ्यांशी त्वरित चर्चा करावी, त्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकरी आणि जवान हे देशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पूर्ण विचार करून त्याची पूर्तता नाही झाली तर आम्हालाही एनडीएमध्ये राहायचे की नाही याचा फेरविचार करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात बळाचा वापर केला तर आम्हालाही सरकारच्या विरोधात आंदोलनात उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. राजस्थानातून हजारो शेतकरी दिल्लीत नेऊन आपण त्या आंदोलनात सहभागी होत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.