श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीत भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याचा निर्णय प्रमुख पक्षांच्या आघाडीने घेतला आहे. त्या आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचाही समावेश आहे.
मोदी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. त्या निर्णयाला विरोध दर्शवत नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीसह पाच पक्षांनी ऑक्टोबर 2020 मध्ये एक आघाडी स्थापन केली.
जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा निर्धार त्या आघाडीने केला. आता ती आघाडी निवडणुकीसाठीही कायम राहील, अशी ग्वाही सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी स्वतंत्रपणे पत्रकारांशी बोलताना दिली. जम्मू-काश्मीरचा सन्मान पुन्हा मिळावा अशी जनतेची इच्छा आहे.
त्या इच्छेनुसारच आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाईल, अशा आशयाची भूमिका अब्दुल्ला आणि मेहबुबा यांनी मांडली. आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. मात्र, प्रमुख पक्ष आघाडी करून लढल्यास भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहू शकते.