फलटण (अजय माळवे) – फलटण तालुक्यातील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी तयार करण्यात आलेल्या यादीत तहसील कचेरी आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबरोबर आपल्या मर्जीतील लोकांची नावे घुसडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नवीन यादी तयार करावी, अशी मागणी होत आहे.
पीक नुकसानभरपाईसाठी शासनाने माहिती मागवली होती. तहसील कचेरी व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले होते; परंतु कुचकामी व निष्काळजीपणे काम करणाऱ्या या दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली नाही.
त्याऐवजी कार्यालयात बसूनच अनेक ठिकाणच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून याद्या तयार केल्या. प्रत्यक्षात ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा अनेक शेतकऱ्यांची नावे या यादीत नाहीत, तर ज्यांचे काहीही नुकसान झाले नाही, अशांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत घुसडण्यात आली आहेत.
या दोन्ही खात्यांमधील अधिकाऱ्यांनी संगनमताने बोगस यादी बनवल्याने प्रशासनाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
सोमंथळी येथे पीक नुकसानीबाबत करण्यात आलेल्या पंचनाम्यांपैकी अनेक पंचनामे बोगस आहेत. कित्येक शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात कोणतेही नुकसान झालेले नाही, त्यांना भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत, तर नदीकाठावरच्या लोकांचे नुकसान होऊनही त्यांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.
प्रत्यक्ष पाहणी न करताच बोगस नोंदी करण्यात आल्याची तक्रार सोमंथळी येथील ग्रामस्थांनी केली आहे. फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पीक नुकसानीच्या बोगस नोंदी झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही नोंदी नसल्याने त्यांना भरपाई मिळालेली नाही. “धोंड तुपाशी आणि शेतकरी उपाशी’ अशी स्थिती झाली आहे.