गृहखाते अजितदादांकडे की राष्ट्रवादीच्या इतर नेत्याकडे?
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार 30 डिसेंबरला होणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, विस्तारात संधी मिळणाऱ्या मंत्र्यांची नावे अजूनही गुलदस्त्यातच आहेत.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर विविध कारणांवरून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यासाठी आधी खातेवाटप ठरले नसल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेसकडून मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले नसल्याने विस्तार लांबल्याची चर्चा सुरू झाली. आता अमावास्या आणि ग्रहणामुळे विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आता मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा मुहूर्त सूत्रांनी सांगितला असला तरी तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अजून त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. अशातच गृहखाते कुणाकडे सोपवायचे यावरून राष्ट्रवादीत संभ्रमावस्था असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृहखाते अजित पवार यांच्याकडे सोपवले जाण्याची अधिक शक्यता आहे.
मात्र, त्या खात्यासाठी जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याही नावांचा विचार होत असल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिपद मिळणार का, याविषयीचा सस्पेन्सही अजून कायम आहे. त्याबाबत कॉंग्रेसच्या गोटातून वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावेळीच मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होईल. विस्तारानंतर कुठले खाते कुणाकडे यावर पडदा पडेल.