कोलकत्ता – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुखर्जी आयोगाच्या विश्वासार्हतेवर नेताजींच्या कुटुंबातील दोन सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या आयोगाने कोणतेही ठोस कारण अथवा परिस्थितीचे विश्लेषण न करता नेताजींना मृत म्हटले आहे. नेताजींचे नात भाचा सूर्य बोस आणि नात भाची माधुरी बोस यांनी एका खुल्या पत्राद्वारे या अहवालाच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित केली आहे.
1999 साली स्थापन करण्यात आलेल्या न्या. मनोजकुमार मुखर्जी यांच्या आयोगाने 8 नोव्हेंबर 2005 रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये नेताजींचा मृत्यू कथित विमान अपघातात झाला नाही आणि टोकियोतील रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या अस्थी नेताजींच्या नाहीत, असे म्हटले होते.
मात्र नेताजींचा मृत्यू नक्की कसा झाला, कोठे आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबतचा कोणताही तपशील या आयोगाच्या अहवालात देण्यात आलेला नाही. तैवानमध्ये कोणताही विमान अपघात झाला नव्हता आणि म्हणूनच नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही, या आयोगाचा दावा विश्वासार्ह नाही, असेही या खुल्या पत्रात म्हटले आहे.