हैदराबाद -तेलंगणात विहिरीत सापडलेल्या मृतदेहांमागील गूढ उकलले आहे. एका महिलेचा केलेला खून दडवण्यासाठी मुख्य आरोपीने तब्बल नऊ जणांचे हत्याकांड घडवल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यातील विहिरीत मागील आठवड्यात नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने मोठीच खळबळ उडाली. ते मृतदेह स्थलांतरितांचे असल्याने सामूहिक आत्महत्येची चर्चा सुरू झाली. मात्र, बिहारचा रहिवासी असणाऱ्या संजयकुमार यादव या मुख्य आरोपीच्या अटकेमुळे संबंधित हत्याकांडाची उकल झाली. हत्या झालेल्यांमध्ये मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी असणाऱ्या कुटूंबातील सहा सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय, त्रिपुराच्या एका रहिवाशाचे आणि बिहारच्या दोन रहिवाशांचेही मृतदेह आढळले.
एका कारखान्यात एकत्र काम करत असल्याने त्यांचा परिचय होता. त्यातून यादवचे पश्चिम बंगालमधील कुटूंबातील एका महिलेशी अनैतिक संबंध निर्माण झाले. त्या महिलेच्या मुलीवरही त्याची वाकडी नजर होती. त्या महिलेला त्याविषयीचा संशय आल्याने यादवने तिचा काही दिवसांपूर्वी खून केला. त्यामुळे दुसऱ्या एका महिलेचा यादववरील संशय बळावला आणि तिने पोलिसांत जाण्याची धमकी दिली. त्यानंतर यादवने रात्री झालेल्या एका घरगुती कार्यक्रमात धमकी देणाऱ्या महिलेबरोबरच इतरांच्या अन्नात झोपेच्या गोळ्या टाकल्या. त्यांना गुंगी आल्यानंतर एक-एक करून ओढत नेऊन यादवने विहिरीत फेकले.
संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची सहा पथके नेमण्यात आली होती. त्या पथकांनी वेगाने तपास करून आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन यादवपर्यंत पोहचण्यात यश मिळवले. यादवनेही त्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.