आयुक्तांसह 13 विभागांत प्रभारी अधिकारी : अधिकाऱ्यांवर कामाचा ताण; सत्ताधाऱ्यांचे आदेशांवर आदेश
नगर – आर्थिक दृष्ट्या नाजूक स्थितीमुळे दिवाळखोरी असलेल्या महापालिकेला आता अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वानवा निर्माण झाला आहे. त्यामुळे आहे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर महापालिकेचा गाडा चालविण्यात येत आहे. सध्या महापालिका आयुक्तांसह तब्बल तेरा विभागांचा कारभार हा प्रभारी पदभार असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात असल्याने महापालिकेचा डोलारा हा प्रभारी राजवर उभा असल्याचे चित्र आहे. एका अधिकाऱ्यांवर दोन ते तीन विभागांचे कामकाज असल्याने तो आपल्या सोईनुसार कामांना प्राधान्य देत आहे. परिणामी महापालिकेच्या बहुतांशी कामांचा बोजवारा उडाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्वच्छानिवृत्तीचा सपाटा महापालिकेत सुरू आहे. नुकतेच प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी स्वच्छानिवृत्ती घेतल्याने महापालिकेला आता सक्षम अभियंताच राहिला नाही. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याकडे आता शहर अभियंत्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. अधिच महापालिकेला प्रभारी आयुक्त आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. द्विवेदी आपल्या सोईनुसार महापालिकेचे कामकाज पाहत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेवून आपल्या फाईलीवर स्वाक्षरी घ्यावी लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाला विलंब होत आहे. त्यात आता शहर अभियंताही प्रभारी आहे. अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याकडे शहर अभियंता हे प्रभारी पद देण्यात आले आहे.
त्यामुळे शहरातील अतिक्रमण विरोधी कामांचा बट्टबोळ लागणार आहे. अधिच अतिक्रमणे काढण्याचा उत्साह त्यात आत हे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार इथापे यांच्याकडे आला आहे. महापालिकेतील महत्वाचे पद आयुक्तच प्रभारी असल्याने जिल्ह्याचा कारभार सांभाळून महापालिका पहावी लागत आहे. सहाय्यक आयुक्तपदासह नगरसचिव या दोन्ही पदाचा पदभार एस.बी तडवी यांच्याकडे आहे. तडवी यांना मुळपदाचे काम सांभाळून सहाय्यक आयुक्तपदासह नगरसचिवचे काम पाहावे लागत आहे. विद्युत विभाग प्रमुख हे पद महापालिकेत वादग्रस्त ठरले आहे. कनिष्ठ अभियंता के. वाय. बल्लाळ यांच्याकडे या पदभार देण्यात आला आहे.
त्यांनी हे पद नाकारले असतांनाही हे पद त्यांना देण्यात आले आहे. अर्थात त्यांना या पदाचे कळू अगर न कळू पण ते हे पद करायचे काम म्हणून करीत आहे. त्यामुळे नगर शहरातील विद्युत दिव्यांच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहे. पण मी काय करू असे म्हणून बल्लाळ त्याकडे जाणिवपूर्व दुर्लक्ष करीत आहेत. महापालिकेत प्रसिद्ध अधिकारी हे पद आहे. तेही आता प्रभारीच आहे. पाणीपुरवठा विभागचे लिपीक डी.एन. कोंडा यांच्याकडे यांच्याकडे प्रसिद्ध अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. याबरोबर कामगार अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार यांच्याकडे देण्यात आला आहे.
त्यामुळे कोंडा यांना दोन पदाचा पदभारासह मुळ विभागाचे कामकाज करावे लागत आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे चार प्रभाग अधिकारी देखील प्रभारीच आहेत. त्यामुळे त्यांना आपले मुळ काम सांभाळून संपूर्ण प्रभागाचे काम करण्याची वेळ आली आहे. प्रभाग अधिकारी प्रभाग 1 चे जितेंद्र सारसर, प्रभाग 2 चे ए.डी. सोनवणे, प्रभाग 3 चे ए.डी. साबळे, प्रभाग 4 अधिकारी नानासाहेब गोसावी असे चारही अधिकारी प्रभारीच आहेत. उद्यान विभाग प्रमुख हे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे लिपीक असलेल्या शशिकांत नजन यांच्याकडे या विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
शहरात सध्या स्वच्छता मोहिम जोमाने राबविण्यात येत आहे. पण या विभागात प्रमुख स्वच्छता निरीक्षक देखील प्रभारीच आहेत. आर. आर. सारसर, व के. के. देशमुख हे दोघेही प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत. घनकचरा व्यवस्थापन हे पद देखील रिक्त असून त्यांची जबाबदारी आरोग्यअधिकारी अनिल बोरगे यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्याबरोबर स्टोअर विभागाचा प्रभारी देखील प्रभारी आहे. महापालिकेत चालू असलेल्या प्रभारी राजमुळे नगर शहराचा विकास खुंटलाच आहे. सत्ताधारी भाजपकडून याकडे दुर्लक्ष आहे. विरोधी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस हे देखील बघ्याची भूमिका घेत आहे. महापालिकेत सक्षम तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांचा अभाव असल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. त्या कामांना कोणीच हात लावण्यास तयार नाही. ही स्थिती महापालिकेची असल्याने विकासाची गती मंदावली असल्याचे चित्र आहे.