40 लाखांच्या काढल्या निविदा
पुणे – करोनाचा वाढता प्रसार आणि लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तर पुढील आर्थिक वर्षातही चांगलीच आर्थिक कोंडी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी 2020-21 च्या अंदाजपत्रकाच्या खर्चात अनावश्यक कामे करू नयेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही, क्षेत्रीय कार्यालयांकडून पथ विभागाच्या माध्यमातून तब्बल 40 लाखांच्या चौक तसेच इतर सुशोभिकरणाच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे शहरात पावसाळ्याच्या तोंडावर तसेच करोनाचा प्रसार सुरू असताना, चौक सुशोभिकरणाची घाई का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शहरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन लागल्याने महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच, करोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य, शहरातील बेघरांची सुविधा, पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई, रस्त्यांची डागडुजी तसेच नागरिकांना दिलेल्या वेगवेगळ्या सवलतींच्या मुदतवाढीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी मागील महिन्यातच सर्व विभाग प्रमुखांना स्पष्ट सूचना देत पुढील अंदाजपत्रकात केवळ अत्यावश्यक कामेच करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच अनावश्यक कामांसाठी कोणताही खर्च करू नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, मंगळवारी पथ विभागाकडून शहरात तीन चौकांचे सुशोभिकरण आणि एका ठिकाणी स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी तब्बल 40 लाखांचा खर्च केला जाणार आहे.
शहरात एका बाजूला करोनाचा प्रसार वाढत असल्याने शहरातील रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सुविधा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मात्र, अशा स्थितीत निधी नसताना सुशोभिकरण खरचं आवश्यक आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
शहरात आता वैद्यकीय सुविधा आणि पावसाळी कामे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा सुशोभिकरणाच्या निविदा काढणेच चूकीचे आहे. महापालिका प्रशासन वारंवार अशाप्रकारे निविदा काढून केवळ उधळपट्टीच करत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे तातडीने या निविदा रद्द करून वैद्यकीय सुविधा पुरविण्याकडे पालिकेने लक्ष द्यावे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच