पुणे : जून संपत आला, तरी पावसाची ओढ कायम आहे. तर, खडकवासला धरणसाखळीने तळ गाठल्याने पुणेकरांना 1 जुलैपासून पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शहराला फक्त दीड महिना पुरेल एवढेच पाणी धरणसाखळीत शिल्लक आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.
शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. धरणांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेऊन बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, 2015 मध्येही अशा प्रकारची पाणीकपातीची कुऱ्हाड पुणेकरांवर कोसळली होती. तसेच नियोजन आता केले जात आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी हवामान विभागाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात जाऊन पावसाबाबत अंदाज घेतला आहे. त्यानुसार हा पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, दररोजच्या पाण्यात कपात केल्यास जलवाहिनीच्या शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय योग्य असल्याची भूमिका पालिका प्रशासनाने मांडली आहे. या सर्व विषयांवर मंगळवारी निर्णय होणार आहे.
नगर रस्ता परिसराला दिलासा
शहरात पाणीकपातीची शक्यता असली, तरी भामा-आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या नगर रस्ता परिसरातील नागरिकांना मात्र दिलासा मिळणार आहे. या धरणात पुरेसा साठा असल्याने या भागांचा पाणीपुरवठा नियमित ठेवण्यात येणार आहे. या योजनेतून कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, येरवड्याचा काही भाग, वडगाव शेरी, नगररस्त्याचा काही भाग तसेच हडपसर परिसरातील काही भागांना पाणी दिले जाते.
नियोजनच फसले
उन्हाळ्याचे कारण पुढे करत पाण्याचा दैनंदिन वापर 1,250 एमएलडीवरून 1650 पर्यंत वाढविला. त्यामुळे आता धरणांत अत्यल्प पाणी शिल्लक असल्याने शहरात पाणी 20-25 टक्के कपात करण्याऐवजी दिवसाआड पाणी देण्याची वेळ आली आहे.