नवी दिल्ली – अब्जावधी भारतीयांच्या दृष्टीने सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी संस्था म्हणजे भारताचे लष्कर आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराची प्रशंसा केली आहे. “द आर्मी कमांडर्स’ द्वैवार्षिक परिषदेचे 26 ते 29 ऑक्टोबर 2020 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या तिसऱ्या दिवशी, काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाला मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
या परिषदेला लष्करातील शीर्ष स्तरावरील अधिकारी उपस्थित आहेत. सध्याची सुरक्षा व्यवस्था, सीमेवरील परिस्थिती आणि या संबंधित सर्व बाबींवर सखोल विचार या परिषदेमध्ये वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. सद्यस्थितीमध्ये सुरक्षा व्यवस्था यंत्रणेसमोर असलेली आव्हाने आणि अंतर्गत स्थिती त्याचबरोबर लष्करामध्ये संस्थात्मक फेररचना, रसदशास्त्र, प्रशासन आणि मनुष्यबळ विकास या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर सीमेवर सुरू असलेल्या स्थितीविषयी बोलताना राजनाथ सिंह आत्मविश्वासाने म्हणाले की, सैन्य ठामपणे उभे आहे, तरीही शांतता कायम राखण्यासाठी आणि संकटाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून आम्ही चर्चा सुरू ठेवणार आहे. दुर्गम भागांना जोडण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या बीआरओच्या अथक परिश्रमाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले.
लष्कर आत्मनिर्भर बनवण्याकडे सरकारचे लक्ष…
सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले आणि युद्धबंदीचे उल्लंघन वारंवार होत आहे, याच्या विरोधात भारतीय सैन्य देत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. आपल्या सैन्याची लढण्याची क्षमता कशी वाढेल आणि सैनिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यावर सरकार लक्ष केंद्रित केले आहे. संरक्षण उद्योगामध्ये आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आयातीला नकार असलेली सूची जारी करण्यात आली आहे. सशस्त्र दलाला भविष्यामध्ये असलेल्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी भारतीय उद्योगांना संरक्षण क्षेत्रामुळे मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सैन्य दलामध्ये महिलांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचा घेतलेला आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी असलेली किमान सेवेचे कलम रद्द करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.