तीन दिवस जोराची वृष्टी
पुणे – मान्सून दाखल होऊनही राज्यात पावसाचा जोर वाढत नव्हता. मात्र, आज (सोमवार) सकाळपासून राज्यातील विविध भागात हलक्या ते जोरदार सरी कोसळू लागल्या. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांना गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आगामी तीन ते चार दिवस पुण्यासह राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्व भाग मान्सूनने रविवारी व्यापल्यानंतर आज, सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक आहे. त्याचबरोबर घाट माथ्यावरसुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात कणकवली येथे 68 मिलीमीटर, मालवण 70 तर रत्नागिरीमध्ये 42 मिलीमीटर पाऊस गेल्या 24 तासांत पडला आहे. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा येथे 46 तर चंदगड येथे 30 इगतपुरी येथे 73 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
पावसाचा जोर वाढल्याने बहुतांशी ठिकाणी तापमान 35 अंशापेक्षा खाली आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतात मान्सूनच्या ढगांची दाटी निर्माण झाली आहे. त्यात पावसासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे. ही स्थिती आणखी तीन ते चार दिवस अशीच राहणार आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा येथे मुसळधार पाऊस पडणार आहे.
पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना येथेही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सून आल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.