पुणे – शहरात रविवारी मध्यरात्री मान्सूनचे अर्थात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मात्र, कमी कालावधीत मोठे अंतर पार केलेला मान्सून पुणे गाठल्यावर काही काळ विसावा घेण्याची शक्यता आहे. तो 11 जूननंतर तो पुन्हा सक्रिय होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
अवघ्या दोन दिवसांत केरळ ते महाराष्ट्र असा वेगाने प्रवास करत मान्सून राज्यात दाखल झाला. त्यापाठोपाठ कोकणाचा बहुतांश भाग व्यापून रविवारी तो पुणे आणि उस्मानाबाद येथे दाखल झाला आहे.
मात्र, हा प्रवास अतिशय वेगाने पार केल्यानंतर आता पुढील तीन ते चार दिवस शहरात पावसाची विश्रांती असणार आहे. या काळात शहरात ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
विभागाच्या माहितीनुसार, रविवारी मान्सूनने अलिबाग, पुणे आणि उस्मानाबाद हा प्रदेश व्यापला असून, आतापर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे.
मात्र, 11 जूनपर्यंत कोकण भाग वगळता इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असेल. हवामानातील बाष्पाच्या कमतरतेमुळे फारसा पाऊस पडणार नाही.
त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रीय होऊन पुढील भाग व्यापेल. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे, तर कोकणावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, मान्सूनने आतापर्यंत राज्यातील 30 टक्के भाग व्यापला असून, त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्मागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, अलिबाग या ठिकाणांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.