नवी दिल्ली : चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवण्यास यश न आलेल्या विक्रम लॅंडरशी संपर्क करण्यासाठी इस्रोतील शास्त्रज्ञ जीवाचा आटापीटा करत आहेत. पुढील दहा दिवसांत विक्रम लॅंडरसोबत संपर्क झाला तर शास्त्रज्ञांच्या आजपर्यंतच्या सर्वच प्रयत्नांना यश मिळणार आहे. मात्र, एकीकडे हे सर्व होत असताना मोदी सरकारकडून इस्रोतील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या पगारवाढीच्या प्रस्तावाला खो देण्यात आला आहे.
केंद्र सरकारचे उपसचिव एम.रामदास यांनी जारी केलेल्या निवेदनात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. एसडी, एसई, एसएफ आणि एसजी या श्रेणीतील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना देण्यात येणाऱ्या दोन पगारवाढ 1 जुलै 2019 पासून बंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी स्पेस इंजिनिअर्सचे अध्यक्ष ए.मणीरमन यांनी 8 जुलै रोजी के.सिवन यांना याविषयी एक पत्र लिहीले होते. के.सिवन यांनी सरकारवर त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव आणावा असे आवाहन मणीरमन यांनी त्यांच्या पत्राव्दारे केले होते. दरम्यान, पगारवाढीचा निर्णय रद्द करण्यासाठी सहाव्या वेतन आयोगाचे कारण सरकारने पुढे केले होते परंतू, सहाव्या वेतन आयोगाच्या 1996च्या शिफारसीनुसार वेतनवाढ करण्यात यावी असे सांगण्यात आले होते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा मणीरमन यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. सरकारच्या या निर्णयाचा सोशलमीडियातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ज्या शास्त्रज्ञांचे सरकार तोंडभरून कौतूक करते त्यांच्याच पगारवाढीला कात्री कसे काय लावू शकते असा सवाल नेटीझन्स विचारत आहेत.