ठेकेदारावर कारवाई करण्याची संतप्त नागरिकांची मागणी
महाबळेश्वर – महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे डांबरी रस्ते अल्पावधीतच खराब होत असल्याने नव्यानेच क्षेत्र महाबळेश्वर गावामध्ये सिमेंट कॉंक्रिटीकरण करुन रस्ते बांधण्यात आले होते. मात्र, दर्जाहीन कामामुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महाबळेश्वर हे अतिपर्जन्यवृष्टीचे ठिकाण आहे. महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची संख्याही अधिक असते. त्यामुळे या पर्यटकांचे दळणवळण सोयीस्कर व्हावे या दृष्टिकोनातून क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी 88 लाख रुपये खर्चून सिमेंट कॉंक्रिटीकरण करुन रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदाराने दर्जा राखला नसल्याने सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
क्षेत्र महाबळेश्वर येथील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केलेल्या ठेकेदारांकडून केलेल्या कामाचा दर्जा, गुणवत्ता व टिकाऊपणाबाबत दिलेल्या हमीपत्राबाबत शासन स्तरावर चौकशी करून सदर सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करण्यात यावी व निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाचा झालेला खर्च वसूल करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार राजेंद्र धोत्रे यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे क्षेत्र महाबळेश्वरातील ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना असून क्षेत्र महाबळेश्वर ग्रामसभेत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे.
14 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये च्या कामाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवून या कामाचा दर्जा क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासावा, शासकीय विशेष लेखापरीक्षण करून घेण्यात यावे व संबंधित ठेकेदाराकडून संपूर्ण रस्ता दुरुस्त करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी कार्यकारी अभियंता, बांधकाम उत्तर विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात शासन दरबारी अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून ठेकेदारावर काय कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.