मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत (सीएए) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सीएएला आपले समर्थन नाही. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातून जे कोणी घुसखोर भारतात आले असतील त्यांना हाकला अशीच आपली भूमिका आहे.
जे देशहिताचे निर्णय केंद्र सरकार घेईल त्याला आपले समर्थनच असेल असेही राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात बोलाताना राज ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात जे मोर्चे काढले जात आहेत, तो संशोधनाचा विषय आहे.
मात्र मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून सीएएला मनसेचा पाठींबा अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यासंदर्भात राज ठाकरे यांनी मंगळवारी कृष्णकुंज निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती.
या बैठकीत त्यांनी सीएए आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसे मुंबईत मोर्चा काढणार आहे तो भारतातील अवैध पाकिस्ऐतानी आणि बांग्लादेशी घुसखोर यांना हाकलून लावा, या मागणीसाठी असणार आहे, असे पक्षाचे नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.
भारतात अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी, बांग्लादेशी कोणीही असोत त्यांना हाकलून द्यावे हीच त्यांची भूमिका होती. हीच भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. पुणे येथे मनसेचे शिबिर झाले तिथेही त्यांनी हीच भूमिका मांडली असे नांदगावकर यांनी सांगितले.
या देशात आधीच 135 कोटी लोकसंख्या आहे. आणखी किती जणांना या देशात सामावून घेणार. या देशात अवैधरित्या राहणाऱ्या लोकांना हुसकावून लावण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. ज्या भूमिका राष्ट्रहिताच्या आहेत त्यांना राज ठाकरे यांनी कायम समर्थन दिले आहे. कलम 370 असेल, राममंदिराचा मुद्दा असेल या प्रश्नी राज ठाकरे यांनी कायम समर्थन दिल्याचेही बाळा नांदगावकर म्हणाले.