सातारा – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल हे भाजपकडून वारंवार बोललं जातं. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी सरकार पडणार असं भाकीत केलेलं आहे. मात्र अद्याप सरकार स्थिर आहे. आता महिला नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी पुढील वर्षी सरकार बरखास्त होणार असल्याचं म्हटलं. त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील इशारा दिलाय. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत त्या बोलत होत्या.
जरंडेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने (ED) योग्य तो निर्णय घ्यावा, यासह नऊ ठराव यावेळी सभेत करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जरंडेश्वरबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. वसंतरावदादांच्या पेन्शनमधून मी माझा औषधांचा खर्च करत आहे. तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर जरंडेश्वरची लढाई लढत असल्याचं शालिनीताई पाटील म्हटलं.
ठाकरे सरकारबाबत भाकित वर्तविताना त्या म्हणाल्या की, ठाकरे सरकारला समाजाविषयी देणे-घेणे नाही. हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा दावा पाटील यांनी केला.
दरम्यान जरंडेश्वर साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीतय न्यायालयाच्या आदेशानुसार, सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला असून, तो लवकरच ईडीकडून आपल्याला मिळेल. सहकारमंत्री अमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वासही शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला.