मुंबई- भारतीय क्रिकेटमध्ये आता एक अत्याधुनिक यंत्रणा दाखल होत आहे. या सब एअर प्रेशर ड्रेन सिस्टिममुळे येत्या काळात कितीही पाऊस पडला तरीही सामना रद्द होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. याचा प्रयोग सध्या हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेने केला असून त्यात शंभर टक्के यश मिळाले आहे.
पावसामुळे सामना रद्द होतो व चाहत्यांसह खेळाडूंचाही हिरमोड होतो. पाऊस थांबल्यावरही मैदान कोरडे होण्यासाठी खूप वेळ लागतो व त्यामुळे षटकेही कमी होतात. तसेच सामनाच पूर्ण होऊ शकला नाही किंवा रद्द झाला तर दोन्ही संघांना समान गुण दिले जातात. हे आता या नव्या प्रणालीमुळे टाळता येणार आहे.
या यंत्रणेत हवेचा वापर करण्यात येत असून त्याचा दाब प्रचंड असल्याने गवताच्या तळात साचलेले किंवा मुरलेले पाणीही काढता येणार असून पाऊस थांबल्यावर केवळ 20 मिनिटांमध्ये संपूर्ण मैदान कोरडे होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला मैदानावर हा प्रयोग करण्यात आला व ही यंत्रणा संपूर्ण मैदानावर बसवण्यात आली आहे. हीच यंत्रणा आता येत्या काळात आंतरराष्ट्रीय सामने होत असलेल्या भारतातील सर्व मैदानांवर बसवण्यात येणार आहे.
याच यंत्रणेची चाचणी आता चिन्नास्वामी स्टेडियमवरही करण्यात आली व त्याचे पूर्ण सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. येत्या काळात पावसामुळे रद्द होत असलेल्या सामन्यांची संख्या कमी होणार आहे. मात्र, त्यासाठी देशातील शक्य त्या सर्व मैदानांवरही ही यंत्रणा बसवली गेली तर त्याचा लाभ खेलाडूंना तसेच चाहत्यांनाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामने आयोजन करत असलेल्या स्थानिक संघटनेलाही होणार आहे. मोठ्या रकमेची तिकिटे काढून येणाऱ्या प्रेक्षकांचा पावसामुळे हिरमोड होते हे असे प्रकारही या यंत्रणेमुळे नाहीसे होण्याचा विश्वासही बीसीसीआयने व्यक्त केला आहे.