कॉंग्रेसच्या सत्यशोधन समितीचा निष्कर्ष
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 5 जानेवारीला बुरखाधारी लोकांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्याचे खरे सूत्रधार त्या विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदीशकुमार हेच आहेत असा निष्कर्ष कॉंग्रेसच्या सत्यशोधन समितीने काढला आहे.
सरकारने कुलगुरूंची ताबडतोब या पदावरून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करावा अशी शिफारसही या समितीने केली आहे. या साऱ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची शिफारसही या समितीच्या सदस्या सुष्मिता देव यांनी केली आहे.
हल्ल्याच्या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी कॉंग्रेसने चार जणांची सत्यशोधन समिती स्थापन केली होती. त्यात अशी माहिती मिळाली आहे की स्वता कुलगुरूंनीच हल्लेखोरांशी संगनमत करून साबरमती हॉस्टेल व विद्यापीठात अन्य ठिकाणी हल्ला घडवून आणला होता.
या ठिकाणाच्या सुरक्षेसाठी जी सिक्युरिटी नेमली आहे त्यांचे कर्मचारीही यावेळी निष्क्रीय राहिले आणि त्यांनी मूकपणे या प्रकाराला पाठिंबाच दिला. त्यामुळे ज्या कंपनीला ही सिक्युरिटी देण्यात आली आहे त्यांचे कंत्राट त्वरीत रद्द करण्याची मागणीही या समितीने केली आहे.
कुलगुरूंची नियुक्ती 2016 मध्ये झाली आहे. त्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे विद्यापीठात सर्व पातळ्यांवर संघ विचारांच्या लोकांची भरती केली आहे असा आरोपही समितीने केला आहे. त्यांच्या विचारांचेच लोक या विद्यापीठात अनागोंदी माजवत आहेत असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे हा हल्ला निसंशयपणे सरकार पुरस्कृतच हल्ला होता असाही या समितीचा निष्कर्ष आहे.