मुंबई – जनतेला नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे, असे महत्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले कि, ते (नरेंद्र मोदी) त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का?, असे पवार यांनी सांगितले.
पर्याय उपलब्ध करून न देण्याचा दोष कुणाचा? यावर पवार म्हणाले, मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की ‘अ’ (मोदी) हा चुकीचा आहे आणि ‘अ’ (मोदी) ला ‘ब’ उत्तर देऊ शकतो. मी असं केलं आहे आणि त्यानंतर मिळणारा लोकांचा पाठिंबा मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात, असेही त्यांनी सांगितले.