नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत करोनाची चौथी लाट आली असून करोनाचा संसर्ग वाढल्याने कारमधून एकट्याने प्रवास करणाऱ्यानाही दिल्ली सरकारने मास्क बंधनकारक केले आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. करोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीव वाचले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
खासगी वाहनातून एकट्याने प्रवास करणाऱ्यांनाही दिल्ली सरकारने मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मास्क नसल्यास दंड आकारण्याचे आदेशही दिल्ली सरकारने दिले आहेत. याविरोधात चार याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिककर्त्यांची कानउघाडणी केली.
एक व्यक्ती जरी खासगी वाहनातून प्रवास करत असेल, तरीही त्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक असेल. वाहनात एक व्यक्ती असो की अनेक मात्र, मास्क लावणे सक्तीचेच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. वैज्ञानिक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारकडून करोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क वापरण्यावर जोर दिला जात आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
काही लसी उपलब्ध झाल्या असल्या, तरी करोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे चेहऱ्यावर मास्क वापरण्यावर जोर दिला जात आहे. व्यक्तीचे लसीकरण झालेले असो वा नसो, मात्र मास्क वापरणे आवश्यकच आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क हे सुरक्षा कवचासारखच आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.