नवी दिल्ली – इंदौरमधील ग्रामीण क्षेत्रातील तरुणांनी समाजासमोर एक सुंदर उदाहरण मांडले आहे. यामुळे त्यांचे सर्वच स्तरांवरून कौतुक केले जात आहे.सीमा सुरक्षा दलातील एक जवान २७ वर्षांआधी शहीद झाले होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय एका साधारण झोपडीत राहत होते. याची माहिती काही समाजसेवक तरुणांना कळताच त्यांनी एका अभियानाची सुरुवात करत ११ लाख रुपये जमा केले. आणि शहीद जवानाच्या कुटुंबियांना घर बांधून दिले. ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तरुणांनी शहीद जवानाच्या पत्नीला आपल्या हातावर चालवत अनोख्या पद्धतीने गृहप्रवेश करत घराची चावी त्यांना दिली.
इंदौरपासून ४० किमीवरील बेगम गावातील मोहन सिंह बीएसएफचे जवान होते. १९९२ साली ते शहीद झाले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय एका साधारण झोपडीत राहत होते. शहीद जवान मोहन सिंह यांच्यामागे त्यांची पत्नी राजूबाई आणि दोन लहान मुले होती. राजूबाईंच्या घराची अवस्था कधीही कोसळेल अशी होती. बांबूच्या सहाय्याने मोठ्या मुश्किलीने त्यांचे घर उभे होते. राजूबाईंना सरकारमार्फत कोणतीही मदत मिळाली नाही. शहीद जवानाच्या कुटुंबाची परिस्थिती पाहून गावातील काही तरुणांनी वन चेक-वन साइन नावाने अभियान सुरु केले. या अभियानातून मिळलेल्या १० लाखातून घर बांधून देण्यात आले. आणि उर्वरित एक लाखातून शहीद जवान मोहन सिंह यांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन दिनानिमित्त राजूबाईंना घराची चावी देत त्यांचा अनोखा गृहप्रवेश केला. यावेळी तरुणांनी आपल्या हातावर शहीद जवानाची पत्नी राजूबाई यांना हातावर चालवत त्यांचा गृहप्रवेश केला.