बलिया – देशातील सगळ्यांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणुका म्हणजे आपल्या लोकशाहीतील एक उत्सव मानला जातो. मात्र या उत्सवाचीही बरीच धाकधुक असते. त्याला कारण आरक्षण सोडत. त्यामुळे अनेकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या अगोदरच मात खावी लागल्याची उदाहरणे आहेत.
वर्षानुवर्षे समाजसेवा केल्यावर सत्तेचा मेवा खायला मिळेल अशी अपेक्षा असते. कारण राजकारण हेही एक प्रोफेशन आहे. समाजसेवा, जनहित वगैरे असते पण ते भाषणापुरते. असे असताना आणि इतकी सेवा केल्यावर जर मैदानात उतरण्या अगोदरच पराभव चाखावा लागला तर ते कोणाला मान्य होणार? त्यामुळे निवडणुकांचा बिगुल वाजल्यापासू उत्तर प्रदेशात रोज चमत्कारीक बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यातील कहर म्हणजे बलियातील एका गावातून समोर आलेली बातमी.
शिवपूर कर्ण छपरा येथील हाथीसिंह 45 वर्षांचे आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. लक्ष्य एकच ते म्हणजे सरपंच व्हायचे. मात्र जशी आपली जागा महिलांसाठी राखीव झाल्याची कुणकुण त्यांना लागली, त्यांनी चक्क दहा दिवसांत आपले लग्न उरकून घेतले. म्हणजे जागा राखीव झाली तरी सरपंच पद घरातच राहण्याची व स्वत: सरपंच पती म्हणून मिरवण्याची तरतूद त्यांनी करून ठेवली आहे.
गेल्या वेळेच्या निवडणुकीत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण झाली नव्हती. तर आता आरक्षण त्यांच्या मार्गातील अडसर ठरला. तेव्हा समर्थकांनी हाथीसिंह यांचा विवाह करण्याचा सल्ला दिला आणि केवळ दहा दिवसांत त्यांनी त्याची अंमलबजावणीही केली. विशेष म्हणजे हिंदू रिवाजानुसार आताचा जो पंधरवडा आहे तो विवाहासाठी योग्य मानला जात नाही. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे, तर त्यांची पत्नी पदवीचे शिक्षण घेत होती. आता शिक्षणासोबतच तिला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही तयारी करावी लागते आहे.