सातारा (प्रतिनिधी) –शहरातील व्यापार- उदीम व इतर सर्व व्यवहारांना सकाळी नऊ ते सात अशी तब्बल दहा तासांच्या शिथिलिकरणाची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली. परिणामी सातारा शहरात वर्दळीचे रस्ते व बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. गर्दीमुळे शहरात काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या सशर्त परवानगीमुळे व्यापारी वर्ग समाधान व्यक्त करीत होता.
सातारा शहरात जिम, हॉटेल, थिएटर, मॉल वगळता सर्व व्यापारी, व्यावसायिक, विक्रेत्यांना सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने व व्यवहार खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचा सातारकरांनी पुरेपूर फायदा उठवला. या सवलतीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होईल, अशी आशा व्यापारी वर्गाला आहे. शहरातल्या दुकानांची वेळ वाढवल्याबद्दल शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना धन्यवाद दिले.
शनिवारी साताऱ्यात मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारा बकरी ईद सणाचा पारंपारिक उत्साह मात्र साधेपणाचा दिसून आला. मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रतिकात्मक कुर्बानी करण्यात आली. तसेच सोमवारी नारळी पौर्णिमा त्यामुळे राख्यांच्या खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत गदी दिसून आली. होलसेल रिटेल मार्केटची चलती सुरू झाली असून जिल्हांर्तगत मालाची वाहतूक सुरू झाली आहे. सराफ बाजारातही वर्दळ दिसून आली. साताऱ्यात कर्मवीर पथ व राजपथावर शनिवारी वाहतुकीची कोंडी झाली.
रस्त्यांवरचे बरेचसे बॅरिकेटस हटवण्यात आले. हॉटेल व्यवसायाला अद्याप परवानगी नसली तरी पार्सल सेवेने गती पकडली आहे. शहरातील शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाल्याने पुस्तकांच्या खरेदीची गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंग अभावाने आढळत होते. नागरिकांनी मास्कची सवय लाऊन घेतली आहे, असे चित्र दिसत होते. गणेशोत्सव तीन आठवड्यांवर येऊन पोहचल्याने “श्री’ मूर्तीच्या नोंदणीची लगबग दिसून आली.
आजपासून हेल्मेटची सक्ती
साताऱ्यात दुचाकीस्वारांचा डबल सीट प्रवासाला परवानगी मिळाली आहे. पोलिसांनी मोती चौक, राजवाडा, पोवई नाका आदीं ठिकाणी दुचाकीस्वारांना कागदपत्रांच्या तपासणीबरोबर हेल्मेटची विचारणा सुरू केली आहे. पहिल्या दिवशी दुचाकीस्वारांना पोलिसांनी केवळ समज देऊन सोडले. मात्र, उद्यापासून हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल, असा इशारा शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विट्ठल शेलार यांनी दिला. या संदर्भात शेलार म्हणाले, “हेल्मेट सक्तीचा लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. या आदेशाची अंमलबजावणी सातारा शहरात करण्यात येत आहे. गाडीवर प्रवास करताना मास्क व हेल्मेट वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. साताऱ्यात हेल्मेट सक्ती सुरू झाल्यास नवा वाद सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.