शेवगाव – करोनाच्या धास्तीने शेवगाव शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा आज ओस पडल्या आहेत. प्रशासनाने 31 मार्चपर्यंत सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे.
तहसीलदार अशिमा मित्तल, नायब तहसीलदार मयुर बेरड व त्यांचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांनी दुकाने उघडणार नाहीत. याची काटेकोर दक्षता घेतली असुन त्याबाबत त्यांना सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, व्यापारी, टपरीधारक आदींचे सहकार्य मिळाले आहे. अद्याप तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही मात्र प्रशासन बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेऊन आहे. दुबई व अन्य देशातून तालुक्यात आलेल्या 4 नागरिकांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर ग्रामिण रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. करोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत आहे.