मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य सोमवारी 4.5 लाख कोटी रुपयांनी वाढले. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार निर्देशांकामध्ये वाढ होत असल्यामुळे आता 179 कंपन्यांच्या शेअरचे भाव 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर आहेत.
शेअर बाजार निर्देशांकांत आज दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मुल्य 272 लाख कोटी रुपयावर गेले आहे.
शेअर बाजारावरील रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम आता संपुष्टात येत आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेसंदर्भातील आकडेवारी जाहीर होत आहे.
ही आकडेवारी सकारात्मक असल्याचे दिसून येत असल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदाराबरोबरच परदेशी गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. आगामी काळातही निर्देशांक वाढण्याची शक्यता बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.