पिंपरी, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व महापुरूषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमित देशाचे पंतप्रधान गेल्या वर्षभरात जवळपास दहा ते बारा वेळा आले. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. त्याकडे पंतप्रधानांनी कानाडोळा केला आहे.
छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे निकृष्ठ काम केले जाते. मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारक उभारणीचे काम प्रलंबित आहे. या प्रश्नांचा जाब मराठा क्रांती मोर्चाकडून पंतप्रधानांना विचारण्यात येणार आहे.
त्यासाठी पुणे येथे गुरूवारी (दि. २६) त्यांच्या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे यांनी दिली.
निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दौरे करत आहेत. गेल्या वर्षभरापासून दहा ते बारा वेळेस ते महाराष्ट्रात आले आहेत. धुळे, रायगड, शिर्डी, मुंबईसह पुणे आदी भागात ते सातत्याने येत आहेत.
या कार्यक्रमात केवळ आश्वासनांचा डोंगर उभा करून सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक करण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. प्रत्यक्षात अनेक योजना न राबविता कागदावरच ठेवल्या आहेत.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सातत्याने उपोषण सुरु आहे.
लाखोंचे मोर्चे आयोजित करण्यात आले. तरी देखील मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही आपली भूमिका उघड करण्यास तयार नाहीत, याचा अर्थ काय, असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे.
रायगड येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यावर केवळ मनधरणी करण्यासाठी माफी मागण्यात आली.
प्रत्यक्षात दोषींवर अद्याप कारवाई केली नाही. मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करून बरेच वर्ष लोटले. परंतु, अद्यापही त्या कामाला सुरुवात केली नाही.
ही महाराष्ट्रातील शिवप्रेमींची फसवणूक आहे. या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्र काढायला तयार नाहीत. मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मराठा आंदोलक विविध प्रश्नांवर त्यांना जाब विचारणार आहेत, असे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.