काले येथील बूथ सदस्य संवाद मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन
मी पळणारा नेता नाही
यशवंतराव मोहितेंचा मी एकमेव वारसदार आहे. मी पळणारा आणि विकून जाणारा नेता नाही. यशवंतराव मोहिते यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव मांडला. कोयना धरण उभारणीचा ठराव मांडला. मी त्या सत्य नेत्याचा कार्यकर्ता व वारसदार आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व कराड दक्षिणमधून निवडून द्या. ज्यांनी सर्वसामान्यांच्या जीवावर संस्था उभ्या केल्या आहेत. त्यांनी त्या जनतेच्या मालकीच्या कराव्यात. मगच गावोगावी जावून मतांचे जोगवे मागावेत. असा टोला डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी लगावला.
कराड – कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के व मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळाले. आजही विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी पत्रावर 15 जुलै 2014 च्या अध्यादेशान्वये असा उल्लेख आहे. असे सांगून देश व राज्याची निवडणुक प्रत्येक बूथमध्ये होते. त्यासाठी बूथ महत्वाचे आहेत. सूक्ष्म नियोजन लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
काले, ता. कराड येथे कराड दक्षिण मतदार संघातील काले व येळगाव जिल्हा परिषद गटाच्या बुथ कमिटी सदस्य संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, नगरसेवक इंद्रजीत गुजर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने, महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, शिवराज मोरे, जखिणवाडी सरपंच ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, नामदेवराव पाटील, बाळासाहेब थोरात, राजेंद्र यादव, पैलवान नानासाहेब पाटील, सेवादल कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, प्रशांत थोरात, उदय पाटील-उंडाळकर, वैभव थोरात, मारुती मोहिते, ऍड. ए. वाय. पाटील, यशवंतराव चव्हाण-पेरलेकर, सुरेश भोसले, आण्णासाहेब जाधव, वाठार सरपंच विलास पाटील, विकास थोरात, जयवंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, कोणतेही नेतृत्व एका दिवसात पुढे येत नाही. जवळच्यांनी ते फुलवायचे असते. मला कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेने केंद्रात मंत्री व राज्याचा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचवले. मी स्वतः मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हतो. मला पक्ष प्रमुखांनी या पदावर बसवले. त्या पदावर पोहचल्यामुळे मला तालुक्यात अठराशे कोटींची कामे करता आली. माझ्या राजकीय प्रवासाचा कराड तालुक्याला फायदा होत आहे. आमचे सरकार नसले, तरी अजून माझा एकही प्रश्न युती सरकार खाली ठेवत नाही. आजमितीला ग्रामीण विकासाचा निधी माझ्या एवढा कुणालाच मिळालेला नाही.
डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, सर्वसामान्यांची नाळ कॉंग्रेसच्या मूळ विचाराशी जोडली पाहिजे. तरच सध्याची राजकीय बिकट परिस्थिती टाळता येईल. भावनात्मक राजकारणाऐवजी रचनात्मक राजकारण करणे महत्वाचे आहे. प्रत्येक बुथवर महिला, युवक, अल्पसंख्याक, वंचित तसेच सेवादलचे कार्यकर्ते क्रियाशील पाहिजेत.
जयवंतराव जगताप म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाला दिशा दिली. परंतु त्यांच्याच कुटुंबातील लोकांना यशवंतराव मोहिते सारखा मनाचा मोठेपणा नाही. कितीही पैसे वाटू देत पृथ्वीराजबाबाच आमदार होणार आहेत. विरोधक आपल्यात फूट पाडण्याचा उद्योग करीत आहेत. याला बळी न पडता आपली एकजूट कायम ठेवावी. असेही आवाहन जगताप यांनी केले.
धनाजी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजीराव मोहिते यांनी आभार मानले.