पुणे – भारतीय संस्कृतीत नारळाला एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक प्रसंगात नारळ, श्रीफल, कल्पफळ, माडफळ या विविध नावांनी आपल्या जीवनात अविभाज्य घटक बनला आहे. संस्कृतमध्ये नारळाला नारिकेल, कन्नडमध्ये टेंगू, इंग्रजीत कोकोनट, लॅटिनमध्ये कोकम असे म्हणतात.
नारळ हे मुख्यता भारत व पॅसिफिक महासागरातील बेटांवरील फळ आहे. भारतात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड आढळते. दक्षिण भारत, मलबार, कोकण, कारवार, श्रीलंका, केरळ, इंडोनेशिया, अमेरिका, आफ्रिका, ब्राझील, भारत येथे एकूण जागतिक उत्पादनापैकी 73 % उत्पादन आढळते. नारळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत…
गुणधर्म – ओल्या नारळाचे पाणी थंड, आल्हाददायक, पोषक, मूत्रगामी, मूत्राचा रंग सुधारणारे व तृषाशामक आहे. नारळ जर कच्चा असेल व त्याच्या आत मलई जर तयार झाली नसेल तर त्या पाण्यात मधुरता कमी असते. तसेच ते थोडेसे आंबट किंवा काहीसे तुरट असते. परंतु खोबरे आत तयार होऊ लागल्यानंतर त्याचे पाणी एकदम मधुर बनते. नारळाच्या पाण्यात असणाऱ्या साखरेचे शरीरात त्वरित शोषण होते. ते पाणी जंतुमुक्त असल्याने अत्यंत सुरक्षित, निर्धोक असते. कॉलऱ्यामध्ये ओल्या नारळाचे पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते.
औषधी उपयोग – कॉलऱ्यामध्ये नारळाचे पाणी अतिशय फायदेशीर आहे. कॉलऱ्यामध्ये जुलाब व उलट्या होत असल्याने शरीरातील पाणी कमी होते व क्षारांची त्रुटी निर्माण होते. अशा वेळी नारळाचे पाणी शरीराला जरूर ते पाणी आणि क्षार पुरवते. नारळाचे पाणी जंतुनाशक असल्याने आतड्यामध्ये कॉलऱ्याचे जंतू असतील तर त्यांचा नाश करते.
कॉलऱ्यामध्ये पोटॉशियम सॉल्टचे इंजेक्शन देण्याऐवजी नारळाच्या पाण्यातून नैसर्गिक पोटॉशियम देण्यात आले तर ते अधिक हितावह असते. नारळाच्या पाण्यात असणाऱ्या “बी’ गटातील जीवनसत्त्वांमुळे हृदय सुदृढ होते, तसेच ज्ञानतंतू आणि पचनसंस्था निकोप ठेवण्याचे ते काम करते. नारळ जसजसा जून होत जातो तसतसे त्यातील पोषक घटक नष्ट होत जातात, म्हणून कोवळ्या नारळाच्या पाण्याचे सेवन करणे अधिक हितावह आहे.
नारळाच्या ताज्या पाण्याचा त्वरित उपयोग केला पाहिजे. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळला असता नारळाच्या पाण्यामध्ये असणारी “सी’ जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. नारळाचे पाणी मूत्रगामी असल्याने सर्व प्रकारच्या मूत्रविकारात व मूतखड्यामध्ये ते अत्यंत गुणकारी आहे.
नारळाचे पाणी त्वचारोगावरही उपयुक्त असते तसेच अशक्तपणात ते सलाईनसारखे काम करते. चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या असतील त्यावर नारळाचे पाणी हे “क्लिझिंग’ सारखे काम करते. चेहरा नितळ होण्यासाठी व सौंदर्यवृद्धिसाठी नारळाचे पाणी उपयुक्त आहे.