मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका : नानापेठेत प्रचार सभा
पुणे – “काश्मीरमध्ये सैन्याचे अधिकार कमी करण्याचा जाहीरनामा कॉंग्रेसचा, की जैश-ए-महमंदचा,’ असा सवाल करीत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर मंगळवारी टीकास्त्र सोडले. देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्याच्या विषयावरूनही त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत फडवणीस बोलत होते. नाना पेठ येथील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सभेत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, गिरीश बापट, अनिल शिरोळे, दिलीप कांबळे, मुक्ता टिळक यांसह भाजप-शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांच्या कार्याकाळातील योजना व विकासांचा आढावा घेत फडवणीस म्हणाले, “राहुल गांधी यांचे पुण्यातील भाषण हे काल्पनिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेस पक्ष गरिबी हटावोचा नारा देत आहेत. आताच्या जाहिरनाम्यात गरिबी हटावोचा उल्लेख आहे. मात्र, आतापर्यंत कॉंग्रेस पक्षाने गरिबी हटविली नाही. ते केवळ भाजपच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदीच करू शकतात. सक्षम नेतृत्व म्हणून मोदी यांनी पाकिस्तानवर सर्जिकल स्टाईक आणि एअर स्ट्राईकवरून जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. रामदास आठवले यांनी कविता सादर करून विरोधकांना टोला लगावला.