नगर – नगरमधील शिवभोजन केंद्रांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्यांच्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्यांच्याऐवजी भलत्याच लोकांना याचा लाभ होत असून, तो कागदोपत्री असल्याचा आरोप दस्तुरखुद्द आमदार संग्राम जगताप यांनीच केला आहे.
त्या संदर्भात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आमदार जगताप यांनी तक्रार केली असून, शिवभोजन केंद्राच्या कारभारात सुधारणा न झाल्यास त्यांना योग्य पद्धतीने जाब विचारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकाराने अल्प दरात गरजूंसाठी शिवभोजन योजना आणली. लॉकडाउनच्या काळात कोणीही गरजू उपाशीपोटी राहू नये, अशी तंबीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली होती. मात्र, शिवभोजन योजनेत केवळ 25 लोकांना जेवण देऊन शिवपंगत संपल्याचा डांगोरा केंद्रचालक पिटतात. त्या संदर्भात थेट खात्री केल्याचा दावाही आमदार जगताप यांनी केला आहे.
गरजूंच्या स्वस्त धान्य दुकानांच्याही अडचणी..!
नगरमधील बहुतांश स्वस्त धान्य दुकाने केवळ दोन तास उघडी असतात. त्यातून लाभार्थ्यांना केवळ नादी लावण्याचा प्रकार होत आहे. धान्यवितरणासाठी ही दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश आहे. मात्र, अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही आमदार संग्राम जगताप दैनिक प्रभातशी बोलताना केला. नगरमधील शिवभोजन केंद्राचा नावाखाली डुप्लिकेट फोटो अपलोड करण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे खरे गरजु अन्नापासून वंचित राहत आहेत, अशी तक्रार जगताप यांनी भुजबळ यांच्याकडे केली आहे.
सचिवांना दिल्या चौकशीच्या सूचना
नगर जिल्ह्यातील अनागोंदी कारभाराविषयी तातडीने चौकशी करा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सचिवांना दिल्या आहेत, असे सांगून जगताप म्हणाले. “”या संदर्भात आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत. ते घेऊन वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहोत, स्वस्त धान्य दुकानांतून होणाऱ्या धान्यवितरणातही मोठा गफला आहे. राष्ट्रीय महामारीच्या संकटात, असे प्रकार घडत असल्याने त्याचे अधिक दु:ख वाटते. लॉकडाऊनमुळे गरिबांना खायला अन्न नाही, अशावेळी तरी दुकानदारांनी किमान आठ तास दुकाने उघडी ठेवून सहकार्य करायला हवे. दोन तासांत ती बंद केली जातात. त्यामुळे गरजूंना धान्यापासून वंचित ठेवले जात आहे, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे जगताप म्हणाले.