सातारा: राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा ‘ येळकोट येळकोट जय मल्हार ‘, सदानंदाचा येळकोट , खंडोबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष भंडारा खोबऱ्याच्या अक्षतांसह वेद -मंत्रांच्या जयघोषात सुमारे पाच ते सहा लाख भाविकांच्या साक्षीने सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने मुख्य मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या मुख्य चौकानजीक सर्व बाजूंनी बॅरिगेटस् लावल्याने मुख्य चौकात मिरवणुकीवेळी भाविकांची होणारी गर्दी आटोक्यात आणण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. तर तारळी नदीपात्रातील दक्षिण बाजू भंडारा खोबऱ्याच्या उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरले होते. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने आसमंत पिवळा धमक झाला होता.
प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी ग्रामपंचायत यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे यावर्षीच्या सुमारे
पाच ते सहा लाख भाविकांच्या अथांग जनसागरात कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडलेल्या सर्वानीच सुटकेचा निःश्वास टाकला खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखी सह देवस्थानच्या आकर्षक रथातून मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.