अनिल देशपांडे
राहुरी – राहुरी-नगर मतदारसंघाचे निवडणूक चित्र आज स्पष्ट झाले. पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. भाजप मित्र पक्षाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मुख्य लढत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्याशी होणार, हे स्पष्ट झाले. सात जण रिंगणात असले, तरी मुख्य लढत आमदार कर्डिले व नगराध्यक्ष तनपुरे यांच्यातच होणार आहे.
यंदा प्रथमच लढत दुरंगी झाली आहे. सलग दोन विधानसभा निवडणुकीत लढत तिरंगी होत होती. भाजप व शिवसेना युतीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक होती. उमेदवारीसाठी स्पर्धा आहे, असे वाटत होते. मात्र कर्डिले निर्धास्तपणे निवडणूक प्रचाराच्या तयारीला लागलेले होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने गावोगाव घोंगडी बैठका घेऊन त्यांनी मतदारांशी संपर्क साधला होता. या मतदारसंघात उमेदवारीची हॅट्रिक त्यांनी साधली आहे.
आता निवडणुकीत ते हॅटट्रिक साधणार का, हाच खरा प्रश्न आहे. सलग दहा वर्षे मतदारसंघात केलेली विकास कामे, व्यापक जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. मतदारसंघातील राहुरी नगरपालिकेच्या 29 कोटी रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वांबोरी चारीसाठी शंभर कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याची योजना, तसेच चार दशकांपासून प्रलंबित असलेला निळवंडेचा शेती पाण्याचा प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न तालुक्यात मार्गी लागले आहेत.
भागडाचारीसाठी एक्सप्रेस फिडर लाईनची व्यवस्था झाली आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतून महत्त्वाचे रस्त्यांची कामे झाली आहेत. या सगळ्या कामांच्या आधाराने मतदार आपल्याला जनादेश देतील, असा विश्वास आमदार कर्डिले व्यक्त करीत आहेत. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम ज्यांनी तिकीट मिळवण्याच्या स्पर्धेत बऱ्यापैकी बाजी मारली, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पक्षाची उमेदवारी आमदार कर्डिले यांना मिळाल्यानंतर आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याचे स्पष्टीकरण कदम यांनी केले.
परिणामी पक्षांतर्गत दुफळीतून राष्ट्रवादीला विशेष मदत मिळणार नाही. खासदार डॉ.सुजय विखे व आमदार कर्डिले यांची युती असून, विखेंची ताकद यावेळी कर्डिलेंच्या पारड्यात जाणार आहे. गत निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे त्यावेळचे उमेदवार शिवाजी गाडे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या सोबत काम करण्यास सुरवात केली होती. पंचायत समितीच्या निवडणुकीत या दोघांच्या युतीमुळे कॉंग्रेसला अर्थातच विखे गटाला पंचायत समितीची सत्ता गमवावी लागली.
शिवाजी गाडे यांच्या निधनाने व्यक्तिशः तनपुरे यांची काही प्रमाणात हानी होणार असली, तरीही यंदा लढत दुरंगी असल्याने कर्डिले विरोधातील सर्व मते ही तनपुरे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगराध्यक्ष या नात्याने केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून व राहुरीचा स्वाभिमान, राहुरीचा आमदार या भावनिक आवाहनाला मतदार या वेळेस प्रतिसाद देतील, असा विश्वास तनपुरे गटाकडे आहे. तसेच जनसेवा मंडळाची हक्काची मते ही त्यांची जमेची बाजू आहे.
तसेच मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचे प्रश्न, ग्रामीण रुग्णालय, रस्ते, एसटी डेपो, औद्योगिक वसाहत, पोलिसांची वसाहत, सचिवालय आदी प्रश्न सोडविण्यात आमदार कर्डिले यांना अपयश आले आहे. हे अपयश तनपुरे यांच्या प्रचाराचा मुख्य भाग आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे.मतदारसंघात पन्नास हजार मतदार संख्या नव्याने वाढलेले आहेत. तसेच पाथर्डी व नगर तालुक्यात एक लाख मतदार आहेत. तो कर्डिले यांचा हक्काचा समजला जातो. तेथे तनपुरे किती मुसंडी मारतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच राहुरी तालुक्यात दोन लाख मतदार आहेत. ते तनपुरे त्यांची मतपेटी किती प्रमाणात भरणार आहेत, यावरही बरेच काही अवलंबून आहे. पंचायत समिती, सेवा संस्था, बाजार समिती, राहुरी नगरपालिका या महत्वाच्या सत्ता तनपुरे गटाकडे आहेत, तर ऍड. सुभाष पाटील व अनेक मातब्बर नेते, विखे गटाची रसद ही आमदार कर्डिलेंसाठी जमेची बाजू आहे. साखर कारखान्याचे बंद पडलेले चाक सुरु करण्यातील आमदार कर्डिलेंची सकारात्मक भूमिका त्यांचेसाठी जमेची बाजू आहे.