राजेश अग्रवाल : हमारी अपनी पार्टीच्या वतीने पदयात्रा
पुणे –लोकसभा निवडणूक म्हणजे विचारांची लढाई असते. समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेणारी विचारसरणी मांडत “हमारी अपनी पार्टी’ वैचारिक लढाई करते आहे. त्याचवेळी पुण्यात भाजप, कॉंग्रेस मैत्रीपूर्ण लढाई लढत आहे, अशी टीका हमारी अपनी पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी केली.
हमारी अपनी पार्टीच्या वतीने शनिवारी सकाळी सोमवार पेठ, मंगळवार पेठ भागात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत सर्व स्तरातील स्त्री, पुरुष, तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते. हमारी अपनी पार्टीने उच्चशिक्षित व्यक्तीला उमेदवारी दिल्याने लोकांनी प्रत्यक्ष भेटून समाधान व्यक्त केले. झोपडपट्टी, जुने वाडे वगैरे भागातील रहिवाशांनी अग्रवाल यांना भेटून त्यांच्या समस्या सांगितल्या. भाजप, कॉंग्रेस पक्षांनी वेळोवेळी आश्वासने फक्त दिली. प्रत्यक्षात काही काम केलेले नाही, असे नागरिकांच्या बोलण्यातून दिसून आले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना अग्रवाल म्हणाले, जात, पात, धर्म असा कोणताही भेद न ठेवता सर्व समाजाचा विकास व्हावा, असा कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांपुढे जात आहोत आणि लोकांना आवाहन करत आहोत. प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली जनता आमच्या पक्षाकडे आशेने बघत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. रामनवमीनिमित्त अग्रवाल यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. राम मंदिरांना भेटी दिल्या.