मुंबई, दि. 22 – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे जे पत्र पाठवले होते तो प्रकार म्हणजे राज्य सरकारच्या बदनामीचाच कट होता, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, हे पत्र पाठवण्यापूर्वी परमवीरसिंह हे दिल्लीत गेले होते आणि तेथे ते कोणाकोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे असून योग्यवेळी ती माहिती उघड केली जाईल, असेही मलिक यांनी म्हटले आहे. या घडीला देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे, अशी माहितीही मलिक यांनी दिली.
ते म्हणाले की, देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार देशमुख यांच्या मंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. देशमुख यांना करोना झाला असल्यामुळे ते 15 फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयातच होते त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाइन होते. त्यामुळे ज्या दिवशी वाझे हे देशमुख यांना भेटल्याचा दावा केला जात आहे त्यात तथ्य नाही, असेही मलिक यांनी नमूद केले.