इस्लामाबाद – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान जेंव्हा पाकिस्तानच्या ताब्यात सापडले होते, तेंव्हा जर पाकिस्तानने त्यांची सुटका केली नसती तर भारताने पाकिस्तानवर हल्लाच केला असता अशी भीती पाकिस्तानातील वरिष्ठ नेत्यांना वाटायला लगली होती.
या भीतीमुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांचेही पाय लटपट कापायला लागले होते. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जनरल बाजवा आणि कुरेशी यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची तातडीने सुटका करण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अशी माहिती पाकिस्तानातील वरिष्ठ विरोधी नेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते सरदार अयाझ सादिक यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी 28 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट इथले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यावेळी काश्मीर आणि अभिनंदन वर्धमान यांच्याही संदर्भात पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र हा पाठिंबा देणे योग्य ठरले नसते. कारण भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी शक्यता पाकिस्तानच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना वाटायला लागली होती, असे सादिक यांनी बुधवारी संसदेत सांगितले.
पाकिस्तानात “पीएमएल-एन’चे सरकार होते तेंव्हा सादिक हे संसदेचे सभापती होते. बालाकोटचा एअरस्ट्राईक, अभिनंदन पकडले जाणे आणि त्यानंतरच्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर लष्कर प्रमुख आणि परराष्ट्र मंत्रीही उपस्थित असलेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीला उपस्थित राहणेही पंतप्रधान इम्रान खान यांनी टाळले होते. या बैठकीला पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीमध्ये भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या कल्पनेनेच लष्कर प्रमुख आणि परराष्ट्र मंत्र्यांना घाम फुटला होता. “भारत आज रात्री 9 वाजता पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याने वर्धमानला परत जाऊ द्या.’ अशी विनंती परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी या बैठकीत केली होती, असे सादिक यांनी सांगितले.
लष्कर प्रमुख जनरल बाजवा आणि परराष्ट्र मंत्री कुरेशी यांच्यापैकी नक्की कोणाला “घाम फुटला’ आणि कोणाचे “पाय लतपटले’ असे सादिक म्हणाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही उच्चस्तरिय बैठक नक्की किती तारखेला झाली, हे देखील सादिक यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले नाही. पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांना संसदेचे नियमही माहित नाहीत, अशी टीकाही सादिक यांनी केली.
अभिनंदन यांच्या सुटकेपूर्वी झाली होती हवाई चकमक
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात शहिद झालेल्या 40 जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 26 फेब्रुवारी 2019 च्या पहाटे भारतीय हवाई दलाच्या विमानांनी खैबर पख्तुनवा प्रांतातल्या बालाकोटमधील जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी प्रतिक्रिया म्हणून घुसलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना हुसकावून लावताना झालेल्या हवाई चकमकीदरम्यान अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाडले गेले आणि ते पाकिस्तान सैन्याच्या तावडीत सापडले होते. मात्र त्यापूर्वी वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. पाक सैन्याच्या तावडीत सापडलेल्या अभिनंदन वर्धमान यांची 1 मार्चला पाकिस्तानने सुटका केली होती.
———————————————-