नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल घेतले असून हवाई दलात सी-295एमडब्ल्यू विमाने समविष्ट होणार आहेत. यासंदर्भात स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस (संरक्षण आणि अवकाश) कंपनीशी वाहतूक विमानांच्या खरेदीबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यत आला आहे.
यासोबतच एक ऑफसेट करारही करण्यात आला असून, त्यानुसार या कंपनीला भारतीय भागीदार कंपन्यांकडून पात्र उत्पादने आणि सेवा खरेदी करणे बंधनकारक असणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीने या महिन्यात या कराराला मंजुरी दिल्यानंतर त्यावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे भारतीय हवाई दलात सी-295एमडब्ल्यू विमाने समविष्ट होणार आहेत. यामुळे हवाई दलाच्या वाहतूक ताफ्याच्या आधुनिकीकरणासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पाच ते दहा टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली ही विमाने अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आहेत.
या करारामुळे आत्मनिर्भर भारत अभियानालाही मोठी चालना मिळणार आहे. यात खासगी उद्योग क्षेत्रांसाठी, तंत्रज्ञान-प्रवण आणि अत्यंत स्पर्धात्मक अशा हवाई वाहतूक क्षेत्रात येण्याचे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या एकूण 56 पैकी 40 लढावू विमाने भारतात टाटा कंपनीद्वारे तयार केली जाणार आहेत. ही सर्व विमाने पुढच्या दहा वर्षात भारताला सोपवली जाणार आहेत.
या सर्व 56 विमानात भारतीय इलेक्ट्रोनिक वॉरफेअर सूट बसवले जातील. सर्व विमाने भारताकडे हस्तांतरित झाल्यानंतर भारतात विमान उत्पादकांनी तयार केलेली विमाने, भारत सरकारने मंजुरी दिलेल्या देशांमध्ये निर्यात केली जातील. या प्रकल्पामुळे भारतातील अवकाश तंत्रज्ञानाला तर बळ मिळेलच; शिवाय अशा विमानांचे सुटे भाग बनवणाऱ्या एमएसएमई कंपन्यांना देखील त्याचा लाभ मिळेल.
उड्डाण क्षमतेला मोठे पाठबळ
ही लढाऊ विमाने, अर्धवट तयार असलेल्या धावपट्टीवरूनही उड्डाण करू शकतात आणि संकटकाळात त्वरित कृती करण्यासाठी किंवा युद्धप्रसंगी सैन्य आणि माल उतरवण्यासाठी त्यात, मागच्या बाजूला एक दारही आहे. हा विमानांमुळे हवाईदलाच्या महत्वाच्या उड्डाण क्षमतेला मोठे पाठबळ मिळणार आहे. विशेषत : उत्तर भाग, ईशान्य प्रदेश आणि अंदमान-निकोबार सारख्यां बेटांवर यामुळे मोठी मदत होऊ शकेल.