भाजपचे सरचिटणीस राम माधव यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर देशासह जगभरात याचे पडसाद उमटले. दरम्यान, राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नजरकैदेत ठेवण्यात आले. दरम्यान,याच मुद्यावरून विरोधकांनी राजकारण करण्यास सुरूवात केली. यावर स्पष्टीकरण देताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी नजरकैदेत असणाऱ्यांना सरकारकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून तिथल्या सर्व सुविधा पुरवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरू नये आणि वातावरण बिघडू नये यासाठी सरकारने अनेकांना नजरकैदेत ठेवले होते. यावर बोलताना राम माधव म्हणाले, सुमारे अडीच ते पाच हजार लोकांना नजरकैदेत ठेवले होते, पण आता केवळ अडीचशे लोकच नजरकैदेत आहेत. परंतु, जे लोक अजूनही नजरकैदत आहेत त्यांना सरकारकडून पंचतारांकित हॉटेल्समध्ये सन्मानाने ठेवले असल्याचे स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिले. तसेच नजरकैदेत असणाऱ्या व्यक्तींचा आदर केला जात असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.