इस्लामाबाद – पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार हे लष्कराच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप करत त्या देशातील 11 विरोधी पक्षांनी एकत्र येत पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट अर्थात पीडीएमची स्थापना केली होती. मात्र या आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्येच एका मुद्द्यावरून सहमती न झाल्याने ही आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली असल्याची बातमी आहे.
नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग पक्ष आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी या दोन प्रमुख पक्षांत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधानसभांचा राजीनामा द्यावा या मुद्द्यावर असहमती झाल्यामुळे आघाडीला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळेच या आघाडीकडून सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी काढण्यात येणारा भव्य मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
विधानसभांचा राजीनामा दिला जाण्याच्या विषयावरून आघाडीत मतभेद असल्याची कबुली पीडीएमचे अध्यक्ष मौलान फजलूर रेहमान यांनी दिली आहे. त्यामुळे आम्ही भव्य मोर्चा स्थगित केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोर्चा काढण्यापूर्वी विधानसभांचा राजीनामा देण्याबाबत 9 पक्षांनी तयारी दर्शवली होती. मात्र पाकिस्तान पीपल्स पार्टीची भूमिका वेगळी आहे. मोर्चा आणि राजीनामे यांची सांगड घातली जाउ नये असे त्यांचे म्हणणे असल्याचे रेहमान यांनी सांगितले.
दरम्यान, या विषयावर आपल्या पक्षाच्या कार्यकारीणीत चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळही मागितला असून त्यांच्या निर्णयाचा आदर करत आम्ही त्यांना वेळ देण्याचे ठरवले असल्याचे रेहमान म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षांच्या आघाडीचे हात बळकट करण्यासाठी नवाज शरीफ यांनी पाकिस्तानात परत यावे असे आवाहन झरदारी यांनी केले होते. त्याला शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी उत्तर दिले आहे. शरीफ यांना पाकिस्तानात परत बोलावणे म्हणजे त्यांना मारेकऱ्यांच्या हातात सोपवण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात घालण्याची ना आमच्या पक्षाची इच्छा आहे ना नेत्यांची असे त्या म्हणाल्या. आमच्या नेत्याची हत्या व्हावी अशी आमची इच्छा नाही असेही त्यांनी म्हटले आहे.