नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनू सिघवी यांनी तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासंबंधीच्या बाबींवर आपली बाजू मांडली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद करून उत्तर दिले. त्यानंतर लंचसाठी ब्रेक घेण्यात आला.
लंच ब्रेकच्या विश्रांतीनंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली आहे. विधानसक्षा अध्यक्ष नेहमी नेत्याशी संवाद साधतात, जे सभागृहाचे सदस्य असतात. व्हीपमध्ये बदल झाल्यास अध्यक्ष नेत्याला विचारणा करतील, ते राजकीय पक्षाकडे जाणार नाहीत असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.शिंदे गटाच्यावतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहातील बहुमत गमावल्याचा हा मोठा पुरावा असल्याचा युक्तिवाद यावेळी त्यांनी केला.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे.