पुणे : तो 40 वर्षे न्यायालयाची पायरी चढला… वकील म्हणून प्रॅक्टीस केली. अनेकांना न्याय मिळवून दिला. मात्र, तो आजारी आहे. आता त्याच्यावर न्याय मागण्याची वेळ आली आहे. देखभाल आणि उपचारासाठी पैसे मिळावेत, यासाठी आयुष्याच्या संध्याकाळी न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे.
त्याने पोटगी मिळावी म्हणून पोटच्या दोन मुले, सुना आणि पत्नीच्या विरोधात दावा दाखल केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांच्या न्यायालयात यावर 14 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्या वकिलाने पुणे जिल्हा न्यायालय आणि सातारा न्यायालय येथे 40 वर्ष वकिली केली आहे.
पॅरालीसीसचा अटॅक आल्यामुळे तसेच 2 वेळा ऍन्जिओग्राफी झाल्यामुळे संबंधित वकील त्यांचा वकिली व्यवसाय करू शकत नाही. त्यांच्या देखभालीसाठी आणि उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून ऍड. राजेश कातोरे, ऍड. नीलिमा खर्डे, ऍड. साक्षी परबत यांच्यामार्फत हा दावा दाखल केला आहे. संबंधित अर्जदाराला लॉकडाऊनच्या काळात दोन्ही मुलांनी एक लाख रुपये आणि दर महिना दोघांनी मिळून
50 हजार रुपये द्यावेत अशी मागणी दाव्यात केली आहे.
अर्जदार यांना दोन मुले आहेत, त्यांनी मुलांचे चांगले संगोपन केले. त्यांची लग्न थाटामाटात लावून दिली. 10 वर्षांपूर्वी अर्जदाराला पॅरालिसीसचा अटॅक आला. त्यांच्या दोन ऍन्जिओग्राफी झाल्या आहेत. आजारी असल्यामुळे वकिली व्यवसाय करू शकत नाही. त्यांच्याकडून घेतलेले लाखो रुपये परत दिले नाहीत. याप्रकरणी अर्जदाराने वानवडी आणि हडपसर पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रार अर्जाची दखल घेण्यात आली नाही.
अर्जदाराला 65 टक्के अपंगत्व आलेले आहे. विविध आजारांमुळे त्यांना पूर्णवेळ हाऊस मेड आणि नर्सची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांकडून देखभाल खर्च मिळावा म्हणून त्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती ऍड. राजेश कातोरे यांनी दिली.