सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणे आवश्यक आहे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा विषय आहे असे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरसंघचालक मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे असे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
एवढंच नाही तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकसंख्येसोबत राम मंदीराच्या विषयावन आपले मत मांडले. लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघा राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलेच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असे प्रतिपादनही मोहन भागवत यांनी केले. अशा प्रकारच्या कायदा आणल्यास लोकसंख्या नियंत्रणात येईल असेही मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता देशात दोन मुले जन्माला घालण्याच्या कायद्यासाठी आग्रही असेल. तसेच देशात यासंबंधी जनजागृती मोहीम राबवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतप्रदर्शन केले. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे. याआधी डिसेंबर महिन्यात देशातली 130 कोटी जनता हिंदूच आहे असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. ज्यावरुन चांगलाच वाद ओढवला होता. आता त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने एक वक्तव्य केले आहे. यावरुन आता विरोधी पक्ष काही वाद निर्माण करतात का? की त्यांचे हे म्हणणे स्वीकारले जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.