केवडिया – देशात भ्रष्टाचाराचा प्रभावी मुकाबला करता येऊ शकतो आणि कोणत्याही मध्यस्थ किंवा दलाला शिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येऊ शकतो असा विश्वास आम्ही गेल्या सहा-सात वर्षाच्या काळात लोकांच्या मनात निर्माण करू शकलो आहोत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय यांच्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. मागील केंद्र सरकार मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती असेही त्यांनी नमूद केले.
कोणत्याही स्वरूपातला भ्रष्टाचार हा लोकांचा अधिकार हिरावून घेतो. देशाच्या विकास प्रक्रियेतही भ्रष्टाचार ही एक मोठी आडकाठी असते. एखाद्या देशात भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार करून फरारी झालेल्या कोणाही व्यक्तीला जगात कोठेही सुरक्षित आसरा मिळता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे.