घोड धरणातील पाणीसाठा 51 वर्षांनंतर घटला : शिंदोडीकर गहिवरले
धरणाच्या निमिर्तीनंतर तीनवेळा गावचे दुरून दर्शन; ज्येष्ठ गावकरी रमले जुन्या आठवणीत
– तेजस फडके
निमोणे – “अरे पोपट, ती झाडं पाहिली का, लहानपणी किती सुरपारंब्या खेळायचो राव, आपण या झाडावर. ते पाहिलं का, तिथं नदीचा काठ होता. खरंच की लगा. भगवंत तिथं मारुतीचं मंदिर होत. तिकडं आपला वाडा होता की राव. जमीन किती सुपीक होती ना राव. आमचं पण सगळं पाण्यात गेलं. घोड धरणात गुडूप झालेले शिंदोडी गाव 51 वर्षांनंतर प्रथमच दिसत आहे. शिंदोडी येथील जुन्या गावातील भग्नावस्थेत असलेले वाडे, मंदिराच्या खुणा पाहून गावकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या जात आहेत. गावच्या आणि बालपणीच्या आठवणी जागविल्या जात आहेत.
शिंदोडी (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील घोड नदीकाठी असलेले जेमतेम 1 हजार लोकसंख्येचं गाव. गावात 2 ते 3 वाडे, मारुतीचं मंदिर, मशीद, तालीम, जिल्हा परिषद शाळा वास्तू होत्या. 1945 मध्ये घोड नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरलं. त्यामुळं गाव पहिल्यांदा विस्थापित झाले. 1954 मध्ये धरणाच्या निर्मितीसाठी गावच्या जमिनी शासनाने संपादित करायला सुरुवात केली. चिंचणी येथे घोड धरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे गाव पुन्हा एकदा विस्थापित झाले. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 1968 मध्ये धरणात पाणीसाठा वाढू लागल्यानंतर शिंदोडी गावाला पाणीसाठ्याने आपल्या कवेत घेतले.
अनेक वर्षे शिंदोडी ग्रामस्थ आठवणी विसरुन गेले. वडीलधारी मंडळींच्या पारावर कधी गप्पा रंगल्या तर जुन्या गावचा विषय आवर्जून निघत होता. दिवसेंदिवस कमी होणारा पाऊस आणि घोड धरणातून होत असलेला बेसुमार पाणी उपसा आदी कारणामुळे धरणातील पाणीपातळीत घट झाली. पहिल्यांदा 2012 मध्ये जुन्या शिंदोडीच्या घराच्या भिंतीचे अवशेष नजरेस पडले. त्यानंतर पुन्हा 2016 मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आणि आता 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे पहिल्यांदा घोड धरणाच्या पाण्याने नीचांकी पाणी पातळी गाठल्याने संपूर्ण गावचा परिसर पाहण्याची संधी शिंदोडी ग्रामस्थांना मिळाली. गावातील वाड्यांची पडझड झाली आहे. सगळीकडे फक्त दगडांचा खच पडलेला आहे. परंतु ज्येष्ठ लोक आवर्जून गाव पाहण्यासाठी जात आहेत. जुन्या गावच्या आठवणीत रमून जात आहेत. ज्येष्ठ नागरिक जुन्या शिंदोडी गावात शाळा शिकलेले भगवंत वाळुंज म्हणाले, आम्ही लहान असताना पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळा सुरु झाली ती आमच्या काळातच. तेव्हा घोड नदीच्या कडेला पिंपळ, वड, लिंब अशी अनेक झाडे होती. नदीच्या कडेला असलेल्या झाडांमुळे गावाला एक ओळख होती.
सात टीएमसी पाणीसाठा असलेल्या सध्या घोड धरणांतून अंदाजे 200 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यात रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा साखर कारखाना पाणीपुरवठा, श्रीगोंदा पाणीपुरवठा योजना, काष्टी पाणीपुरवठा योजना आदी मोठ्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. दरवर्षी पाऊस कमी होत असल्याने घोड धरणाच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे भविष्यात कायम पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
जुन्या गावात सर्व जाती-धर्माची लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत होती. गावात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने सगळे जण एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होत होते.
– हभप रामदास महाराज फडके, शिंदोडी.
घोड नदीला पूर आल्यावर पहिल्यांदा गाव विस्थापित झाले. तेव्हा मी 16 वर्षांचा होतो. आम्ही बैलगाडीन सर्व साहित्य घेऊन नवीन ठिकाणी रहायला गेलो होतो. जुन्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे तेथे मारुतीच मंदिर, खंडोबा तसेच भैरवनाथ मंदिर, मशीद, तालीम सर्व होत.
– रंगनाथ वाळुंज, माजी सरपंच, शिंदोडी.